बळीराजाला सध्या पिक वाढीसाठी युरिया खताची आवश्यकता असताना युरियाचा मात्र तुटवडा - अजय सुरवसे
बीड (प्रतिनिधी): वारंवार पावसाने तडी देवून शेतकर्याला दुष्काळाच्या खाईत नेवून घातले होते. त्यात कोरोनासारख्या विषाणुच्या रोगराईमध्ये शेतकर्यांचे कंबरडे मोडले. मात्र यावर्षी वरूण राजाच्या कृपेने समाधानकारक पाऊस पडला असल्याने पिके चांगली आलेली आहेत. कोळपणी, खुरपणी, फवारणीची कामे मोठ्या जोरात सुरु असून पिकांंना खते घालण्याची कामे सध्या चालू असताना पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले खत युरिया याचा मात्र कृषी दुकानामध्ये तुटवडा दिसून येत आहे. यामुळे शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. याच कालावधीमध्ये युरिया खताची पिक वाढीसाठी खूप आवश्यकता असते. सध्या थोड्या प्रमाणात युरिया मिळत जरी असला तो ही अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे. अगोदरच लॉकडाऊनमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने शेतकरी मोठ्या मानसिक ताणतणावाचा सामना करत आहे. ज्या प्रमाणात युुरिया खताचा पुरवठा होत आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे. यामुळे शेतकर्यांची कृषी दुकानात अडवणूकही होत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने युरिया खताचा तुटवडा लक्षात घेता याबाबत उपाययोजना कराव्यात आणि शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे अजय सुरवसे यांनी केली आहे.
प्रतिनिधी औसरमल गौतम सह
ननवरे कृष्णा
