हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा. - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.
आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
आमच्या हक्काचा जीएसटीचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. तो मिळत नाहीये. पत्रावर पत्र दिली जात आहेत. त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते. ते जर पैसे मिळत नसतील. ही जीएसटीची पद्धत जर फसलेली असेल, तर मला वाटतं पंतप्रधानांनी सुद्धा प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा केली पाहिजे, नाही तर पुन्हा जुन्या करप्रणालीवर जाण्याची गरज असेल, तर तसं त्यांनी केलं पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
कर गोळा करण्याचा जो अधिकार आमच्याकडे होता. त्यावेळीही शिवसेना जीएसटीला विरोध करत होती. इथला पैसा दिल्लीत जाणार, मग दिल्ली सगळीकडे वाटणार. पैसा येत नाहीये. जीएसटी जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल, तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी या व्यासपीठावरून आवाहन करतोय की, पुढे या यावर चर्चा करूया. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले.
कोणाच्या पैशातून बिहारला फुकट लस देत आहात? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा साधेपणाने साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाच्या हॉलमध्ये दसरा मेळावा साजरा करण्यात आला.





