माजी केंद्रीयमंत्री भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन.
अहमदनगर - माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे आज, पहाटे निधन झाले आहे. गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीत खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गांधी यांना तब्यतीची तक्रार जाणवल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यात त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्याचे आज पहाटे दिल्लीतच निधन झाले. गांधी हे अहमदनगर दक्षिणमधून तीन वेळा खासदार म्हणून दिल्लीच्या संसद भवनात गेले होते. केंद्रीयमंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली होती. त्यांच्या निधनाने भाजपची मोठी हानी झाली आहे. अहमदनगरच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

