२४ जुलै रोजी नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन.
शेतकरी कर्जमाफी सह इतर मागण्यांसाठी राहुरीत चक्काजाम आंदोलन- सुरेशराव लांबे पा.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांचे कैवारी दिव्यांगाचे नेते बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची कर्जमाफीसह शेती मालाला हमीभाव व इतर मागण्यांसाठी येत्या गुरुवार दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत राहुरी मार्केट यार्ड समोर नगर मनमाड रोड वर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात राहुरी तालुक्यासह राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील शेतकरी, शेतमजूर कामगार, दिव्यांग, मेंढपाळ यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आव्हान मधुकर घाडगे व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केली. वरील मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व तहसीलदार यांना देण्यात आले.
सरकारने निवडणुकीच्या अगोदर शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळले नाही, म्हणून गेली दोन महिन्यापासून बच्चुभाऊ कडू यांनी मोझरी येथे अन्नत्याग उपोषण आंदोलनासह, १३८ कि.मि. अमरावती ते यवतमाळ पदयात्रा करून शेतकऱ्यांचा ७/१२ उतारा कोरा कोरा कोरा करण्यासाठी विविध आंदोलन केले.
परंतु गेंड्याच्या कातडीच्या या सरकारला जाग यावी यासाठी पुन्हा येत्या २४ जुलै वार गुरुवार रोजी राहुरी सह संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे सह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार असून राहुरी तालुक्यातील मेंढपाळ, शेतकरी, शेतमजूर कामगार, दिव्यांग यांनी या न्याय हक्काच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.
यावेळी जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, उपाध्यक्ष विजय म्हसे, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे, चंद्रकांत रेबडे, महेश शेलार, रमेश शेलार, जुबेर मुसानीं, विजय सूर्यवंशी, फिरोज मन्सुरी, संजय देवरे, प्रहार युवाचे अध्यक्ष ऋषिकेश ईरुळे सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.