मंचरः शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मोठ्या भावाने शिवसेना उपनेते आढळराव पा.यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत शिवराळ भाषेत टीका केली आहे. याबाबत कट्टर शिवसैनिक व आढळराव पाटलांचे शिष्य मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी आक्रमक होत सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुणे - नाशिक सेमी हायस्पीड लोहमार्गास राज्याच्या अर्थसंकल्पात नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यावरून खा. कोल्हे आणि माजी खा. आढळराव पाटील यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. त्यावरूनच विद्यमान खासदारांचे बंधू सागर कोल्हे यांनी खालच्या पातळीवर जाऊन आढळराव पाटलांवर सोशल मीडियावरून टीका केली आहे. मात्र या कारस्थानास खा.कोल्हे हेच जबाबदार असून त्यांनी आढळराव पाटलांची जाहीर माफी मागावी. नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देवू असा इशारा मा. सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात पुणे नाशिक महामार्ग जलद रेल्वे मंजुरीवरून आजी व माजी खासदारांमध्ये मोठा श्रेयवाद निर्माण झाला आहे. याबाबत मा. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी सतरा वर्षा पासून संसदेत लढा दिला. व या मंजुरीचे श्रेय घेतले . त्यामुळे शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना व त्यांच्या मोठ्या बंधूना आढळराव पाटलांनी घेतलेलं श्रेय सहन न झाल्याने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील त्यांचे बंधू सागर रामसिंग कोल्हे यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषेत आपल्या फेसबुक पेजवरून टीका टिप्पणी केली. आढळराव यांची सोशल मीडियावर होत असलेली ही बदनामी बुधवारी (ता. 11 मार्च) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांच्या लक्षात आली. त्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक तथा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी आक्रमक होऊन मंचर पोलीस ठाण्यात सागर कोल्हे यांच्या विरोधात तक्रार दिली असून सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
पत्रकारांशी बोलताना मा.सरपंच गांजाळे म्हणाले कि, लोकनेते मा.खासदार आढळराव पाटलांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जनतेसाठी सतरा वर्ष दिले असून त्यांनी केलेली कामे जनतेला माहिती आहेत. पंधरा वर्ष अहोरात्र झटून जनतेसाठी महत्वाची विकासकामे संसदेतून मंजूर करून आणली आहेत. लोकनेते आढळराव पाटलांनी मतदारसंघात मंजूर करून आणलेल्या कामांचे आयते श्रेय लाटण्याचे काम विद्यमान खासदार कोल्हे करत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी राजे यांचे नाव घेऊन राजकारण करणारे खा.कोल्हे यांनीच औरंगाबाद येथील नामांतराबाबत वेगळी भूमिका मांडली. त्यामुळे कोल्हे यांचे स्वार्थी राजकारण मतदारसंघातील जनतेला समजले आहे. खा.कोल्हे हेच लोकनेते आढळराव पाटलांच्या बदनामी पाठीमागाचे सूत्रधार असून त्यांनी एका महत्वाच्या पदावर असताना निदान जेष्ठतेचा तरी आदर ठेवला पाहिजे होता.असे म्हणत माजी सरपंच गांजाळे यांनी निषेध व्यक्त केला आहे.


