भाजप सरकारच्या काळात मलाही त्रास झाला - ना. शंकरराव गडाख.
मागील पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. परंतू शिवसेनेची सत्ता असताना गृहमंत्री कोणाकडे होतं आणि सत्ता कोण चालवत होतं हे सर्वांना माहिती आहे. मी इतक्या खोलात जाणार नाही पण भाजप सरकारच्या काळात मलाही खूप त्रास झाला आणि हे चुकीचं आहे असं म्हणत शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
उस्मानाबाद येथे बोलतांना शिवसेनेचे मंत्री गडाख म्हणाले,गेल्या पाच वर्षांमध्ये मी आमदार नसताना सत्तेचा गैरवापर करुन मला अशाच पद्धतीने त्रास देण्यात आला. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला. 2019 च्या विनाधनसभा निवडणूकीत नेवासा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले गडाख नंतर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहील्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आपल्याला होणारा त्रास. पक्षाकडून न मिळणारं सहकार्य असे अनेक मुद्दे मांडत सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करण्याचा सल्ला दिला. यानंतर शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने भाजप सरकारच्या काळात आपल्यालाही अशाच पद्धतीने त्रास झाल्याचं म्हटलंय.
ते पुढे म्हणाले,"शेतकरी आंदोलन प्रकरणात माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नव्हती. नोटीस न मिळाल्यामुळे मी शेवटच्या तारखेला हजर झालो नाही. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या 20 ते 25 जणांच्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली आणि मला त्रास दिला. सत्ता मिळवण्याकरीता आणि राखण्यासाठी होणारे हे प्रकार दुर्दैवी असून त्यावर आळा घालणं गरजेचं असल्याचं", गडाख यांनी बोलताना स्पष्ट केलं.

मागील सरकारच्या काळात माझ्या अडचणीच्या वेळेस मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मला खूप मदत केली होती व आधार दिला होता.- मंत्री शंकरराव गडाख





