मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार - आरपीआय.
"बेस्ट बिफोर" नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी- अनुसंगम शिंदे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
"बेस्ट बिफोर" या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या राहुरी येथील मिठाई व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी आरपीआय आठवले गटाचे शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे यांनी तहसीलदार चंद्रजित राजपुत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
नियमानुसार मिठाईच्या ट्रे समोर "बेस्ट बिफोर" अर्थात मिठाई किती दिवसात खावी, अन्न व औषध प्रशासनाचा ऑनलाइन दूरध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. परंतु राहुरी शहरातील बऱ्याच मिठाई दुकानात अशा प्रकारचे फलक नाहीत. त्यामुळे अनेक दिवसांची मिठाई खाल्ल्याने ग्राहकांना व शक्यतो लहान मुलांना विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच जुलाब, उलट्या, पोटदुखी असे अनेक आजार शहरात फैलावत आहेत. राहुरी येथे भेसळयुक्त खवा राजरोस विकला जातो. अनेक दुकानदार एक्सपायरी झालेल्या मिठाई, केक खुलेआम विकतात. तरी प्रशासनाने प्रत्येक मिठाई दुकानदारस तशा प्रकारची प्रकारची सूचना द्यावी व सूचनेची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे, राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे, राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनिल चांदणे, सागर साळवे, नविन साळवे, रविंद्र शिरसाठ आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती अन्न व औषध प्रशासन मंत्री, सहाय्यक आयुक्त-अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.
