Type Here to Get Search Results !

पारनेर : दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करत नाही ! खा. नीलेश लंके यांचा विरोधकांना टोला

 दुसऱ्याच्या झेंड्यावर आम्ही पंढरपूर करत नाही !


खा. नीलेश लंके यांचा विरोधकांना टोला 


पारनेर बस स्थानकाचे भूमिपूजन संपन्न 


पारनेर : प्रतिनिधी 




पारनेर बसस्थानकाच्या नवीन इमारतची आपण सर्वात प्रथम चार साडेचार वर्षांपूर्वी,मार्च २०२० मध्ये तत्कालीन परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली.त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला.इमारतीच्या कामाला मंजुरी मिळवली असे असताना विरोधक म्हणतात की,आमच्या कामाचे श्रेय घेऊ नका.जे काम मी आणले,त्यांचे भूमिपूजन मीच करणार ना.

दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करण्याची मला गरजच काय असा सवाल करीत खासदार नीलेश लंके‌ यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.

      पारनेर बसस्थानक इमारतीच्या २ कोटी ६६ लाख रूपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका इंदिरा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी रोहोकले होते.

      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,

तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे,माजी सभापती गंगाराम बेलकर,सुदाम पवार, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, उपनगराध्यक्षा जायदा शेख, प्रियांका खिलारी, खंडू भूकन,मारूती रेपाळे,राहुल झावरे,

डॉ.बाळासाहेब कावरे, बाजार समितीचे संचालक बापू शिर्के,किसन सुपेकर,किसनराव रासकर, योगेश मते  पुनम मुंगसे व्यासपीठावर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, आमदार म्हणून मी सकारात्मक काम केले त्यामुळेच हजारो कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळेच तालुका विकासात अग्रेसर असल्याचे चित्र आहे. मतदारसंघात मी प्रामाणिक काम केले म्हणूनच मतदारांनी मला लोकसभेत पाठविल्याचे खा. लंके यांनी सांगितले. 

         खा. लंके म्हणाले, पारनेर बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मी आमदार झाल्यापासून बसस्थानकासाठी माझा पाठपुरावा सुरू होता. आज या कामाचा शुभारंभ होतोय याचा आनंद आहे. नव्या बसस्थानकामुळे पारनेरचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

       बस स्थानकाच्या कामाचे कोणी श्रेय घेतले तर जनतेला ते कसे पटेल.

काल आलेले विरोधक आम्ही काम मंजूर केले असल्याचे सांगत आहेत.

विकास कामांसाठी ठराविक प्रक्रिया असते त्यासाठी मी सन २०२० पासून पाठपुरावा केला आज या कामाचे भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचे सांगतानाच खासदार नीलेश लंके यांनी विरोधकांना टोला लगावला. 

   विधानसभेचा निकाल कसा लागला आहे हे सर्वांना माहीती  आहे. पूर्वी राजकीय लोक ईव्हीएमवर संशय घेत होते. आज शेतामधील भगिनीही ईव्हिएमवर अविश्वास व्यक्त करत आहे. राज्यात सरकार आल्यावर वेगळा उत्साह असतो तो दिसला का असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमच्या जोरावरील विजय टिकणारा नसतो.ज्यांनी निवडणूक सोडली त्यांच्या तोंडात या निवडणूकीत जांभुळ पडल्याचे सांगत खा. नीलेश लंके यांनी निवडणूकीच्या निकालावरही भाष्य केले.  

  समाजातील दुर्लक्षीत घटकांसाठी काही केले पाहीजे यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठान काम करते. दिव्यांग संघटनेचे सुनिल करंजुले यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी एक योजना हाती घेण्यात आली आहे. शासन दिव्यांगांना हजार-दिड हजारांची मदत करते. आमच्या योजनेतून दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभे करण्यात येणार आहे.  वर्षभरात ५०० दिव्यांगाना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे उद्दीष्ट असल्याचे खा. लंके यांनी यावेळी सांगितले.       


▪चौकट 


डायलेसीस व मॅमोग्राफी केंद्र सुरू करणार 


     रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेल्या दात्यांना साडेपाच लाख रूपयांची पॉलिसी देण्यात आली. गोरगरीबांना काही घटना झाल्यास मदत मिळावी  ही भूमिका त्यामागे आहे. लवकरच मॅमोग्राफी व डायलेसीस सेंटर सुरू करण्याची योजना आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर तालुक्यातील रूग्णांना  त्याचा फायदा होणार असल्याचे खा. लंके म्हणाले. 


▪चौकट


सुर्य तळहाताने झाकता येत नाही

 

     आंबेडकर भवनासाठी आम्ही  अडीच कोटी रूपयांचा निधी मंजुर  केला आहे. मात्र त्यात काहींनी खोडा घातला. सुर्य तळहाताने झाकता येत नाही असे सांगतानाच सत्ता सर्वसामान्यांसाठी वापरण्याची भूमिका असली पाहिजे असे खा. लंके यांनी सांगितले.


▪चौकट


मला दिल्ली मिरवायला पाठविले नाही !


     कांदा, दूध शेतमालाच्या प्रश्नावर आवाज उठविला. दूध प्रश्नावर आवाज उठविला. गेल्या आठवडयात सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी दिल्लीत मंत्र्यांना पत्र दिले आहे. सोमवारी दिल्लीत गेल्यानंतर या प्रश्नावर संसदेच्या पायरीवर आंदोलन करणार आहे. मुदतवाढ झाली नाही तर मलाच तुरूंगात डांबा अशी भूमिका मी घेणार आहे. मला तुम्ही दिल्ली मिरवायला नाही पाठविले तुमचे प्रश्न मांडण्यासाठी पाठविले असल्याचे खा. लंके म्हणाले.  






ईव्हिएमच्या जोरावरचा विजय टिकत नसतो !  


विधानसभेचा निकाल कसा लागला आहे हे सर्वांना माहीती  आहे. पूर्वी राजकीय लोक ईव्हीएमवर संशय घेत होते. आज शेतामधील भगिनीही ईव्हिएमवर अविश्वास व्यक्त करत आहे. राज्यात सरकार आल्यावर वेगळा उत्साह असतो तो दिसला का असा प्रश्न उपस्थित करत ईव्हीएमच्या जोरावरील विजय टिकणारा नसतो.ज्यांनी निवडणूक सोडली त्यांच्या तोंडात या निवडणूकीत जांभुळ पडल्याचे सांगत खा. नीलेश लंके यांनी निवडणूकीच्या निकालावरही भाष्य केले. 



▪चौकट


काय होणार तालुक्याचे ?


     सहा वर्षापासून खा. लंके यांचा बसस्थानकाच्या कामासाठी पाठपुरावा सुरू होता. असे असताना आ. दाते यांच्यामुळे हे काम मंजुर झाल्याच्या बातम्या छापून आल्या. या कामाचे वर्षापूर्वीच टेंडर मंजुर  झालेले  असताना आ. दाते यांचा या कामाशी काय संबंध ? खा.लंके यांच्या पाठपुराव्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. भूमिपूजन जाहिर झाल्यानंतर अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला. काय होणार तालुक्याचे ? पाणी योजनेचे श्रेय घेण्याचा असाच प्रयत्न होईल. ही योजना कोणी आडविली हे सर्वश्रुत आहे. ही योजना खा. लंके हेच आणणार आहेत. 


अर्जुन भालेकर 

जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 


▪फोटो ओळ


२ कोटी ६६ लाख रूपये खर्चाच्या पारनेर बस स्थानकाच्या कामाचे खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.