महावितरणच्या वसुली धोरणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, गुरुवारी राहुरीत रास्ता रोको आंदोलन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
मुळा धरण काठच्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे मोठा फटका बसत असून, महावितरणच्या "वीजबिल भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर सुरु करणार नाही" या आडमुठ्या धोरणा विरोधात शेतकऱ्यांनी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी (१६ जुलै) नियोजित असलेला मोर्चा रद्द करून आता गुरुवारी (१७ जुलै) सकाळी ११:३० वाजता राहुरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन होणार आहे. नगर-मनमाड महामार्गावर हे आंदोलन होणार असून, मुळा धरण काठच्या प्रत्येक डीपीवरील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, "आपण महावितरणच्या वसुलीला विरोध करत नाही. मात्र सध्या शेतीच्या उभारणीची, मशागतीची व खतांची कामे सुरू असल्याने आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे वीजबिल भरण्यासाठी दोन महिन्यांची सवलत मागत आहोत. हिच आमची माफक व रास्त मागणी आहे."
हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, शेतकऱ्यांचे स्वाभिमानी आंदोलन आहे. कोणीही राजकीय हस्तक्षेप न करता शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.