Type Here to Get Search Results !

गुहा ,राहुरी - अक्षय कर्डिले आमदार होणे म्हणजेच विकासकामांना गती मिळणे - डॉ सुजय विखे पाटील

 अक्षय कर्डिले आमदार होणे म्हणजेच विकासकामांना गती मिळणे ; डॉ सुजय विखे पाटील 


गुहा (प्रतिनिधी)


स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या पश्चात ही निवडणूक केवळ एका पदासाठी नसून या भागाच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे. अक्षय कर्डिले यांना निवडून देणे म्हणजे पर्यायाने डॉ. सुजय विखे पाटील यांनाच आमदार म्हणून निवडून देण्यासारखे आहे. अक्षय कर्डिले आमदार झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक अर्जावर आणि कामावर मी स्वतः लक्ष देऊन ते पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो, असा ठाम विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. 







भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारसभांमधून जोरदार भूमिका मांडत, अक्षय कर्डिले आमदार होणे म्हणजेच माझ्या माध्यमातून विकासकामांना गती मिळणे,असा ठाम विश्वास व्यक्त केला. तांबेरे, गुहा गणेगावसह विविध गावांतील सभांमध्ये त्यांनी मतदारांना विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे आवाहन केले.


तांबेरे येथे गुहा व आरडगाव गणातील कार्यकर्त्याची बैठक डॉ सुजय विखे पाटील यांचा प्रमुख उपस्थित संपन्न झाली. यावेळी देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या भाषणात त्यांनी निळवंडे पाणी प्रकल्पाचा इतिहास उलगडताना विरोधकांवर टीका केली. पूर्वी केवळ पाहणी आणि आश्वासनांचे राजकारण झाले, पण प्रत्यक्षात पाणी मिळवून देण्याचे काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री असताना केले, असे ते म्हणाले. पाण्यासाठी दशकांपासून संघर्ष करणाऱ्या गावांना न्याय मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.


गुहा गणातील परिसरासाठी १८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देत त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गुहा येथे साडेपाच कोटींचा रस्ता पूर्ण झाला असून, ताराबाद येथे ग्रामीण रुग्णालय आणि अनेक गावांत सभा मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच, पुढील तीन वर्षांत ‘पीडीएन’ प्रणालीद्वारे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले. 


या निवडणुकीत विकासासाठी सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले. मात्र, कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगत, प्रत्येक घरापर्यंत प्रचार पोहोचला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.


प्रचाराची सांगता करण्यासाठी २० एप्रिल रोजी राहुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले.


विखे म्हणाले मी लोकांसाठी आणि गरिबांसाठी काम करतो. पराभवानंतरही मी थांबलो नाही,” असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा जनसेवेचा संकल्प व्यक्त केला. राहुरी तालुक्यातील ही निवडणूक आता विकास विरुद्ध विरोधक अशी रंगत चालल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.


ही केवळ निवडणूक नाही, तर आपल्या गावाच्या विकासाची आणि भविष्यातील वाटचालीची निर्णायक लढाई आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आणि मतदाराने विकासाच्या विचाराला प्राधान्य देत एकजुटीने मतदान करून अक्षय कर्डिले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणे हीच आपली खरी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले.