फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ऊसतोड मजुरांच्या मुलांसोबत प्रहारची दिवाळी- आप्पासाहेब ढूस.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू साहेब यांचा आदर्श समोर ठेवून दिपावली फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ऊसतोड मजुरांच्या मुलांना राष्ट्रिय बाल दिनाचे निमित्ताने कपडे वाटप करुन या मुलांसोबत यंदाची दिवाळी साजरी केल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमूख आप्पासाहेब ढूस यांनी सांगीतले.
प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही यावर्षीच्या दीपावली फटाक्यांच्या खर्चाला फाटा देऊन ऊसतोड मजुरांच्या मुलांना कपडे वाटप करून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षीही शेतातील ऊसतोड मजुरांच्या मुलांना अशाच पद्धतीचे कपडे वाटप करून आम्ही दिवाळी साजरी केली होती. आपण जेव्हा दीपावली साजरी करत असतो तेव्हा हे गोरगरीब शेतमजूर ऊसतोड कामगार शेतामध्ये राबत असतात व पाचटामध्ये दीपावलीच्या दिवशी विना कपड्याची त्यांची मुले खेळताना पाहून मन हेलावते.. अशा प्रसंगी केवळ प्रसिद्धी म्हणून हे काम आम्ही करत नसून गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने आम्ही राबवत आहोत.. आमच्या शेतामध्ये ऊस तोडणीसाठी येणाऱ्या मजुरांच्या मुलांना कपडे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असतो.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चुभाऊ कडू हे सातत्याने गोरगरिबांसाठी आणि अंध अपंगांसाठी झटत असतात त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही काहीतरी करावे असे सारखे वाटत असल्याने आम्ही यावर्षी दीपावली फटाक्यांना फाटा देऊन हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.. आणि, योगायोगाने आज पाडव्याच्या दिवशी राष्ट्रीय बाल दिन असल्याने हा बाल दिनही या निमित्ताने अश्या पद्धतीने साजरा करण्याची आम्हाला संधी मिळाली.
या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की फटाक्यांवर खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरीब मुलाला कपडे दिल्यास त्याचे संपूर्ण वर्ष आनंदाने जाऊ शकते.. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी व्यर्थ खर्च टाळून अशा गोरगरिबांना मदत करावी असे आवाहन आप्पासाहेब ढूस यांनी शेवटी बोलताना केले.
