Type Here to Get Search Results !

राहुरी - शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

 शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.



निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करा, अन्यथा जनआंदोलन- रविंद्र मोरे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. ती आश्वासनांची पुर्तता तातडीने करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता राज्य सरकारने तातडीने  करावी व दिलेला शब्द पूर्ण करावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून द्यावा, मागील ५ वर्षात केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे.


त्यातच सोयाबिन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आर्दीच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. डी.ए.पी. मध्ये पुन्हा २५० रूपयांची वाढ झालेली आहे. किटनाशके, तणनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे.


सरकार हमीभाव जाहीर करते. पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावा पेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झालेले आहे. एका बाजूला केंद्र सरकार देशातील कार्पोरट कंपन्यांचे १० लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत ते कर्ज राईट ऑफ केल जात.


तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते, हे अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत. राज्य सरकारने आपला दिलेला शब्द पाळावा अन्यथा संपुर्ण कर्जमाफीसाठी राज्यातील शेतक-यांना रस्त्यावर उतरवून सरकार विरोधात मोठे जनआंदोलन सुरू करून महायुती सरकारला शेतकरी हितासाठी पुढाकार घेण्यास भाग पाडू, असे निवेदनात म्हटले आहे, 

          यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल लोंढे, प्रकाश देठे, सतीश पवार, प्रमोद पवार, अनिकेत कुलकर्णी, सुनील इंगळे, अरुण दौले, आनंद वने, भोसले आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.