टॉवरमधील बॅटर्यांची चोरी, पोलिसात गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील रिलायन्स जिओ टेलिकॉमच्या टॉवरमधून सुमारे ७५ हजार रुपये किमतीच्या बॅटर्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत संतोष रामभाऊ साळवे (वय ४० वर्षे, रा. आगाशेनगर, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे. ते रिलायन्स जिओ टेलिकॉममध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुपरवायझर म्हणून कार्यरत असून दि. १७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्यातील टेक्निशियन गणेश बानकर यांनी साळवे यांना फोनद्वारे देसवंडी येथील जिओ टॉवर बंद पडल्याची माहिती दिली.
त्यानंतर सकाळी साळवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता टॉवरमधील ओ.डी.सी. रॅकमधून बॅटर्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये कॉसलाईट १०० एएच कंपनीच्या पाच बॅटर्यांचा समावेश असून प्रत्येक बॅटरीची किंमत सुमारे १५ हजार रुपये आहे. एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित बॅटर्यांचे सिरीयल क्रमांकही पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३९६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
